कधी ना कधी प्रत्येक माणसाला स्वतःच्या दुर्दशेची जाणीव होतेच होते. आपला स्वतःचा स्वतःवर ताबा नाही ही गोष्ट तीव्रतेने त्याच्या लक्षांत येते. तो बंदिवान (कैदी) आहे, परिस्थितीने बांधलेला आहे, परंतु ही परिस्थिती नेमकी काय आहे हें तो सांगू शकत नाही.
“गुलामगिरीतून स्वातंत्र्यात” हें छोटे पुस्तक ह्या समस्येवर पवित्र शास्त्रातून (बायबलमधून) प्रकाश टाकते. ह्यांत दिलेले स्पष्टीकरण समजण्यास कठीण नाही, तत्वज्ञानाचे हें क्लिष्ट विवेचन नाही, तर व्यावहारिक भाषेत उपयुक्त होईल असें हें स्पष्टीकरण आहे. सर्वप्रथम, ही गुलामगिरी कसल्या प्रकारची गुलामगिरी आहे तें स्पष्ट केले आहे, व त्यानंतर या गुलामगिरीतून मुक्तता खरोखरीं कशी मिळते तें दाखवून दिले आहे.
ज्यांना स्वतःच्या आयुष्यात देवाच्या ज्वलंत सामर्थ्याचा – म्हणजेच प्रभू येशूच्या शुभवर्तमानाचा अनुभव आलेला आहे, त्यांना स्वानुभवाने माहीत आहे कीं त्यांच्या जीवनातून अंधकाराला घालवून दिले गेले आहे व त्यांच्याकरिता नूतन महान दिन उजाडला आहे. गुलामगिरीची व नैराश्याची जागा स्वातंत्र्याने (पापापासून स्वातंत्र्य) घेतली आहे, विश्वासी भक्ताचा ख्रिस्ताच्या लोकांमध्ये समावेश झाला आहे, आणि आता त्याला नव्याने सापडलेल्या त्याच्या उद्धारकाशी त्याचा रोजच्या रोज आनंदमय समागम होतो. ज्यांनी ही मुक्तता अनुभवली आहे, त्यांच्याकरिता त्या मुक्ततेच्या क्षणापासून जीवन पार बदलून गेले आहे. आता पूर्वीसारखी कोणतीच गोष्ट राहिलेली नाही, कारण कीं सर्व गोष्टी खरोखरींच नव्या झाल्या आहेत. 102p
.png)
